चौथ्या दिवशी टीम इंडिया मैदान मारणार, विजयापासून भारत 6 विकेट्स दूर

IND VS BAN 1st test 3rd Day : प्रकाशाअभावी तिसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाची 38 वी ओव्हर सुरु असतानाच थांबण्यात आला. या दरम्यान बांगलादेशने 158 धावा केल्या आणि 4 विकेट्स गमावल्या. 

पुजा पवार | Updated: Sep 21, 2024, 05:38 PM IST
चौथ्या दिवशी टीम इंडिया मैदान मारणार, विजयापासून भारत 6 विकेट्स दूर  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 1st test 3rd Day : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्याचा तिसरा दिवस शनिवारी 21 सप्टेंबर रोजी पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करून बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान दिले. प्रकाशाअभावी तिसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाची 38 वी ओव्हर सुरु असतानाच थांबण्यात आला. या दरम्यान बांगलादेशने 158 धावा केल्या आणि 4 विकेट्स गमावल्या. तेव्हा आता विजयापासून टीम इंडिया केवळ 6 विकेट्स दूर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नेमकं काय काय घडलं याविषयी जाणून घेऊयात. 

ऋषभ पंत आणि शुभमन गिलचं शतक : 

टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्येही समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरले. यावेळी युवा स्टार फलंदाज ऋषभ पंत आणि शुभमन गिल या दोघांनी मोठी पार्टनरशिप करून टीम इंडियाची धावसंख्या 500 पार पोहोचवली. यात ऋषभ पंतने 128 बॉलमध्ये 109 धावा केल्या, हे त्याचे 6 वे शतक होते. या दरम्यान त्याने 13 चौकार आणि 4 सिक्स ठोकले. तर बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या इनिंगमध्ये शुन्यावर बाद झालेल्या शुभमन गिलने देखील शतक ठोकले आणि नाबाद 119 धावा केल्या. या दरम्यान त्याने या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 4 सिक्स लगावले. शुभमनचं टेस्ट क्रिकेटमधील हे 5 वं शतक ठरलं. 

हेही वाचा : ऋषभ पंतने लगावली कमबॅक सेंच्युरी, पण मैदानात उतरण्यापूर्वी बॅट सोबत नेमकं काय केलं? Video आला समोर

 

यशस्वी जयस्वालच्या कॅचची चर्चा : 

विजयामचं आव्हान पूर्ण करण्याकरता बांगलादेशकडून झाकीर हसन आणि शादमान इस्लाम या सलामी फलंदाजांची जोडी मैदानात उतरली. या दोघांनी जवळपास 62 धावांची पार्टनशीप केली. दोघेही मैदानात जम बसवत होते तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना त्यांना बाद करणे शक्य होत नव्हते. 15 ओव्हरपर्यंत बांगलादेशची एकही विकेट काढण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. अखेर  17 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बुमराहने टाकलेल्या बॉलवर झाकीर हसनने शॉट खेळला. मात्र मैदानात फिल्डिंग करत असलेल्या यशस्वी जयस्वालने चपळाई दाखवून झाकीरची कॅच पकडली, त्यामुळे भारताला बांगलादेशची पहिली विकेट मिळाली. सध्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

ऋषभ पंतने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी : 

ऋषभ पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकून टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि कर्णधार एम एस धोनीच्या (MS Dhoni) विक्रमाशी बरोबरी केली आहे. एम एस धोनीने टीम इंडियाचा विकेटकिपर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 6 शतक लगावली. याच रेकॉर्डची शनिवारी ऋषभ पंतने बरोबरी केली. ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेट कारकिर्दीत एकूण सहा शतक ठोकली आहेत. यामुळे पंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.